मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या घटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने लागू केलेले निर्बंध काही प्रमाणात शिथील केले आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या डोसचे प्रमाण ९० टक्के आणि दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे ७० टक्के आहे तसेच १५ ते १८ वयोगटातील मुलांचं राज्य सरकारच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण झालं आहे, अशा जिल्ह्यांमधील कोरोना निर्बंध शिथील करण्यात आले आहेत.राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं डिसेंबर अखेर आणि जानेवारी महिन्याच्या सुरुवातीच्या पंधरावड्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमिक्रॉन बाधितांच्या संख्येमुळं निर्बंध लागू केले होते. राज्य सरकारच्या या आदेशाचा ११ जिल्ह्यांना फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांना सूट मिळाली असून नव्या आदेशाने फायदा होणार आहे. राज्य सरकारच्या नव्या आदेशानं चौपाट्या, गार्डन सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
आजपासून नवी नियमावली लागू
राज्य सरकारनं जाहीर केलेली नवी नियमावली आजपासून लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्यानं ठाकरे सरकारनं लसीकरण अधिक झालेल्या जिल्ह्यांतील निर्बंध शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या आस्थापना सुरु होतील तेथील कर्मचाऱ्यांचं पूर्ण लसीकरण झालेलं आवश्यक आहे. तर, येणाऱ्या ग्राहकांचं देखील लसीकरण पूर्ण असणं आवश्यक आहे. येत्या काळात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नवे आदेश लागू केले जाणार आहेत. आजपासून नवी नियमावली मुंबई, पुणे, भंडारा,गोंदिया, चंद्रपूर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, सांगली. कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये लागू होईल.
- एस्सल वर्ल्डसारखे पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु
- स्विमिंग पूल,वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु
- हॉटेल, थिएटर ५० टक्के क्षमतेने सुरु
- सलून, स्पा ५० टक्के क्षमतेने सुरु
- लग्नासाठी २०० जणांना परवानगी
- अंत्यविधीसाठी कोणतीही मर्यादा नाही
- सर्व कार्यक्रमांना ५० टक्के क्षमतेने परवानगी
- पर्यटन स्थळ पुन्हा सुरू होणार
- स्थानिक प्रशासनाच्या वेळेनुसार बीचेस, गार्डन, पार्क खुली होणार
- रेस्टॉरंट, थिएटर, नाट्यगृह ५० टक्के उपस्थितीत सुरू
- भजन आणि सांस्कृतिक कार्यक्रम ५० टक्के उपस्थितीत सुरु
- लग्न समारंभ २५ टक्के लोकांच्या उपस्थितीत
- खेळाच्या स्पर्धा लोकांची ३५ टक्के उपस्थिती
- नाईट कर्फ्यू रात्री ११ ते सकाळी ५