चंद्रपूर :- जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील वर्धा नदीकिनारी पोत्यात भरून असलेले एक शव आढळल्याने पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आणि एक मोठे हत्येचे प्रकरण पुढे आले. पत्नीने आपल्या प्रियकर आणि आईच्या मदतीने कोळसा खाणीत काम करणाऱ्या पतीची हत्या केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मारूती काकडे (वय 34) सरकारी कोळसा कंपनीत खाण कामगार होता. तो मद्यपी असल्याने पत्नी प्राजक्ताशी त्याचे कौटुंबिक वाद होत असत.प्राजक्ताचे स्वतःच्या बहिणीचा दीर संजय टिकलेसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांनी मारूतीचा कायमचा काटा काढण्यासाठी कट रचला. मारूतीचा मृत्यू झाला तर आपल्याला सरकारी नोकरी मिळेल व प्रियकरासह विवाह करून आयुष्य सुखी होईल असा प्राजक्ताचा होरा होता. दोघांनी अत्यंत शांत डोक्याने कट रचला. बल्लारपूर शहरापासून दूर 50 किमी अंतरावर असलेल्या नकोडा येथे कट तडीस नेला. एक साथीदार विकास नागरले याची मदत घेण्यात आली. विकास हा ठरल्यानुसार, मारुतीच्या घरी पोहोचला. किरायाने घर मिळेल का? याबाबत विचारपूस करण्यासाठी त्याला बाहेर बोलावून त्याला दारू पाजण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर दोघे जण घरून बाहेर निघाल्यावर नकोडा इथं पोहोचले. त्यानंतर तिथेच मारुतीचा गळा आवळून खून करण्यात आला. तो जिवंत राहू नये यासाठी नदीपात्रात बुडवण्यात आले व नंतर मृतदेह एका पोत्यात भरून पुन्हा बल्लारपूर शहरालगत असलेल्या वर्धा नदी किनारी फेकण्यात आले.
पोलिसांना मृतदेह तातडीने मिळावा व त्यानंतर मृत मारुतीच्या जागी आपल्या नोकरीची प्रक्रिया सोपी व्हावी हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, पोलिसांनी मयताचे मोबाईल कॉल डिटेल्स व आरोपींचे डिटेल्स यांची पडताळणी केल्यावर पोलिसांना संशय बळावला. पोलिसांनी पत्नीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. पोलिसांनी आरोपींना अटक केली. यात पत्नी प्राजक्ता, तिची आई कांता म्हशाक्षेत्रे, प्रियकर संजय टिकले व कटात सहभागी साथीदार विकास नागरले यांचा समावेश आहे. या सर्वांना अटक करून न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आपल्या प्रियकरासह पत्नीने केलेली पतीची हत्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.