त्याचे झाले असे की, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर लोकवस्तीपासून थोडे दूर अगदी हायवेवर सचिन हॉटेल आहे.
चंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. दुकाने, हॉटेल्स, रोजगार सारे काही बंद होते. 4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र चोरी न करता त्याने आधी फ्रीजमधील पाण्याची बॉटल काढून तहान भागवली. त्यानंतर हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही खिशात भरले. नंतर मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. टेबलाचे ड्रॉवर उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र, ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला.
पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला. त्याने गल्ला उघडून रक्कम मोजून जागेवर ठेवली. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही. मात्र, चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमधील प्रकाराने संचारबंदीतील वास्तव पुढे आणले, हे नक्की.