
चंद्रपूर :-
जिल्ह्यातील जनतेला निवडणूक जिंकण्यासाठी २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन देवून आता जनतेची फसवणूक केल्याने आमदार किशोर जोरगेवार यांचे आमदार पद रद्द करून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला लॉक डाऊन च्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल सरसकट माफ करा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फ राज्यपाल याना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिलेल्या निवेदनातुन केली आहे.
देशासह चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना व्हायरस प्रकोपाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद असल्यामुळे हजारो लोकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. तर काही ठिकाणी कामगारांच्या पगारामध्ये कपात करण्यात आली, एवढेच नव्हे तर कोरोनाच्या संकटात जिल्ह्यातील नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत असतानाच वीज कंपनीने मोठ्या रकमेचं वीज बिल पाठवून ग्राहकांसमोर एक प्रकारे संकट उभे केले आहे, मात्र यावर सत्ताधारी नेत्यांनी आणि विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असली तरी वीज ग्राहकांना दिलासा देण्याची मागणी अजून अनुत्तरित आहे, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना मागील महिन्यात तहसीलदार वरोरा यांच्या मार्फत निवेदन देवून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला लॉक डाऊन च्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल माफ करून ग्राहकांना मोठा दिलास देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती, मात्र अजून पर्यंत शासन स्तरांवर कुठलाही निर्णय झाला नसून वीज कंपनी कडून वीज बिल भरण्यासाठी वीज ग्राहकांना मेसेज येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती होऊन त्या वीज निर्मिती प्रकल्पात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असल्याने जिल्ह्यातील जनतेला दमा अस्थमा, त्वचेचे व स्वसनाचे आजार मोठ्या प्रमाणात होऊन त्यांचे आरोग्य नेहमीच धोक्यात येत आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे वीज बिल माफ करावे अशी मागणी नेहमीच होत होती, मात्र या संदर्भात चंद्रपूर विधानसभेचे आमदार किशोर जोरगेवार यानी विधानसभा निवडणुकीत निवडून येण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील वीज ग्राहकांना २०० युनिट वीज मोफत देण्यात यावी अशी मागणी घेवून आंदोलने केली होती, यासाठी धरणे आंदोलन व फेसबुक लाइव्ह च्या माध्यमातून चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला या करिता आव्हान करून आपण शासनाला चंद्रपूर साठी २०० यूनिट वीज माफ करण्यास बाध्य करूच असे आश्वासने दिली, त्यावर जनतेने विश्वास ठेवून त्यांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेने तब्बल ७२ हजार पेक्षा जास्त मतांनी अपक्ष उमेदवार असताना सुद्धा निवडून दिले. निवडून आल्यानंतर त्यांनी ज्यांची सत्ता येईल त्यांना समर्थन
द्यायचे व चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला २०० युनिट वीज माफ करून घ्यायची असे त्यांनी सांगितले होते. दरम्यान भाजप शिवसेना यांची युतीची सत्ता बसेल म्हणून किशोर जोरगेवार यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून त्यांना जाहीर समर्थन दिल्याची बातमी होती, मात्र नंतर राजकीय समीकरण बदलले आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी यांची महा आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यांनी या आघाडीला पाठिंबा दिला. त्यामुळे सत्ताधारी आघाडीला आमदार किशोर जोरगेवार यांनी पाठिंबा दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला २०० युनिट वीज माफ होईल अशी अपेक्षा होती, मात्र लॉक डाऊन च्या काळात जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अपेक्षेपेक्षा जास्त वीज बिल ते सुद्धा तीन महिन्याचे एकाच वेळी आल्याने वीज ग्राहक संतापले असताना आमदार किशोर जोरगेवार हे गप्पच होते,यामुळे प्रसारमाध्यमांमधे त्यांच्या विरोधात बातम्या झळकल्यानंतर केवळ ऊर्जामंत्री यांना त्यांनी निवेदने देवून टाईमपास केला व जिल्ह्यात ऊर्जा राज्यमंत्री आल्यानंतर पुन्हां निवेदन दिले आहे. पण ज्या २०० वीज युनिट च्या मुद्यांवर किशोर जोरगेवार निवडून आले तो मुद्दा त्यांनी सत्ताधारी गटात असताना शासनाकडे लावून धरायला हवा होता तो तर बाजूला गेलाच पण लॉक डाऊन च्या काळातील किमान तीन महिन्याचे वीज बिल माफ करण्यासाठी तरी त्यांनी पुढाकार घ्यायला हवा होता परंतु तसे न करता जिल्हा पोलिस अधीक्षक यांची भेट घेवून चंद्रपूर जिल्ह्यात दारू येते कशी ? हा प्रश्न त्यांनी केल्याने ते मूळ मुद्द्यापासून भटकले असल्याने किमान चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील जनतेला त्यांनी मूर्ख बनविले व त्यांची एक प्रकारे फसवणूक केली आहे त्यामुळे त्यांना आमदार या पदावर राहण्याचा अधिकार त्यांनी गमावला असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राजू कुकडे यांच्या नेत्रुत्वात राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन देवून किशोर जोरगेवार यांची आमदारकी रद्द करा अशी मागणी केली
आता लॉक डाऊन च्या काळात जनतेला मोठ्या प्रमाणात अंदाजे वीज बिल पाठवून वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना आर्थिक संकटात टाकले आहे. एकीकडे दोन वेळेचे जेवण मिळविण्यासाठी काही कुटुंबाची धावपळ सुरू आहे अशातच वीज बीलाची अवाजवी रक्कम भरायची कशी ? हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर असताना सत्ताधारी गटात असलेले आमदार किशोर जोरगेवार चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला आश्वासने देवून सुद्धा राज्य शासनास निर्णय करण्यास बाध्य करण्यास असमर्थ ठरत असल्यामुळे त्यांनी एकप्रकारे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेशी धोखाधडी केलेली आहे. व जनतेला वाऱ्यावर सोडून आमदार म्हणून मिरवीत असल्याने जनतेला खोटी आश्वासने देणे व निवडून आल्यानंतर जनतेला वेगळ्या मुद्द्याकडे भटकवणे हा लोकशाहीमधे गंभीर प्रकार असून ज्या मुद्द्याला घेवून त्यांना निवडून दिले तो मुद्दाच जर ते विसरणार असतील तर त्यांना आमदार बनून राहण्याचा अधिकार नाही त्यामुळे राज्यपाल यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेवून आमदार किशोर जोरगेवार यांची आमदारकी रद्द करावी व चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेला किमान लॉक डाऊन च्या काळातील तीन महिन्याचे वीज बिल सरसकट माफ करावे अशी मागणी मनसे तर्फे करण्यात आली, यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यासह मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, शहर अध्यक्ष मनदिप रोडे. विवेक धोटे, प्रकाश नागरकर , मनोज ताम्बेकर, अतुल दिघाडे, रमेश कालबान्धे, करण नायर, शाहरुख अली, महेश शाश्त्रकार व इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.